रामायण खरंच घडल्याचे काही पुरावे आहेत का? (शब्दशः प्रत्येक काल्पनिक घटना नाही तर युद्ध व राम नामक व्यक्तीबद्दल पुरावे काय आहेत)

हो, रामायण घडल्याचे अनेक पुरावे सापडतात. ह्या उत्तरात मी ते देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे महाभारताप्रमाणे रामायणातील शहरे आणि वस्तू ह्या उत्खननात शोधणे अवघड असल्यामुळे ते घडले होते हे सिद्ध करण्यासाठी थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो.

फोटो स्रोत - गूगल


  • वाल्मिकी ऋषी आणि राम हे दोघेही समकालीन होते. रामायणामध्ये वाल्मिकींनी असे नमूद केले आहे कि त्यांनी रामायणातील घटनांचा आधी अभ्यास केला आणि नंतर रामायण लिहले. तसेच श्री रामाने त्यागल्यानंतर सीता मातेने काही काळासाठी वाल्मीकींच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला होता. त्यामुळे तिच्याकडून काही घटनांचा तपशील वाल्मिकींना नक्कीच समजला असेल.
  • रामायणामध्ये वाल्मिकींनी रामाच्या मागच्या ७३ पिढ्यांची माहिती अगदी तपशीलवार दिली आहे. तसेच त्यांच्या कुळातील कोणत्या पूर्वजाने कोणाशी लग्न केले ह्याची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. ह्याव्यतिरिक्त सीता मातेच्या पूर्वजांची माहिती पण देण्यात आली आहे. जर वाल्मिकींना एखादी पुराणकथा लिहायची असती तर एवढा तपशील देण्याचा खटाटोप का केला असता? हिंदू धर्म सोडून इतर धर्मातील असे अनेक देव आहेत ज्यांच्या मागच्या पिढ्यांबद्दल काही माहिती सापडत नाही. तरी असून त्यांना देवत्व देण्यात आले आहे आणि त्याला कोणाचा विरोध नसतो मग श्री रामाबद्दल दुजाभाव का?
  • हजारो वर्षांपासून रामायण वगळता इतर शेकडो पुस्तकांमध्ये रामाचे आणि रामायणकालीन कथांचे वर्णन करण्यात आले आहे. जर राम आणि रामायणातील इतर व्यक्ती ह्या अस्तित्वात नसल्या असत्या तर इतक्या लेखकांनी त्यांचे वर्णन करायचे का श्रम घेतले असते?
  • भारताव्यतिरिक्त श्रीलंका, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये रामायणाच्या निगडित कथा प्रचलित आहेत. इतकेच नव्हे तर जगातील अनेक ठिकाणांना रामायणातील व्यक्तींची किंवा त्या संबंधित नावे देण्यात आली आहेत. रामायण जर पुराणकथा असती तर इतर देशांमध्ये त्याला इतक्या गंभीरपणे स्वीकारले गेले असते का?
  • खगोलशास्त्र (रामायणात वर्णन केलेल्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून) आणि गणित ह्यांची सांगड घालून काही विद्वानांनी रामायणातील काही प्रसंग कधी घडले त्यांच्या तारखांबद्दल अंदाज लावला आहे. रामाचा जन्म इ. स. पु. ४ डिसेंबर ७३२३ रोजी झाला. राम आणि सीता ह्यांचा विवाह इ. स. पु. ७ एप्रिल ७३०७ रोजी सम्पन्न झाला. रामाचा राज्याभिषेक इ. स. पु. २९ नोव्हेंबर ७३०६ रोजी करण्यात आला. रामायणाचे युद्ध इ. स. पु. ३ ते १५ नोव्हेंबर ७२९२ ह्या कालखंडामध्ये लढले गेले. १५ नोव्हेंबर ७२९२ ह्या दिवशी रावणाचा वध करण्यात आला. तो गुरुवारचा दिवस होता आणि फाल्गुनी अमावस्या होती असे वाल्मिकींनी लिहले आहे. आपण पडताळून बघितले असता असे लक्षात येते कि तो खरोखरच गुरुवारचा दिवस होता.
  • रामायणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या अनेक जागा जशा की अयोध्या, जनकपूर, प्रयाग, चित्रकूट, दंडकारण्य, किष्किंधा आणि पंचवटी अश्या कित्येक जागांना आता पण भेट दिली जाऊ शकते.

रामायणाशी संबंधित काही जागांबद्दल आणि तिथे सापडणाऱ्या पुराव्यांबद्दल माहिती खाली देत आहे.

राम सेतू

हिंदी महासागरात दिमाखाने पसरलेला आणि भारत व श्रीलंका ह्या दोन देशांना जोडणारा राम सेतू हा रामायणासंबंधित सगळ्यात मोठा पुरावा आहे. काही संशोधनानुसार राम सेतू हा मानवनिर्मित आहे आणि अगदी १४ व्या शतकापर्यंत ह्या सेतूवरून चालत जाणे शक्य होते असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.


रामायणकालीन नागाच्या फणेसारखी दिसणारी गुहा, श्रीलंका

रावणाने सीता मातेचे अपहरण करून ह्या गुहेमध्ये बंदिस्त केले होते असे मानले जाते. ह्याचे पुरावे पण उपलब्ध आहेत. ह्या गुहेमध्ये अनेक शिलालेख आणि भित्तिचित्रे कोरण्यात आली आहेत ज्यामध्ये सीता मातेबद्दल स्पष्ट उल्लेख केलेले आढळून येतो.


हनुमानाच्या पाऊलखुणा

अशोक वाटिकेमध्ये जेव्हा हनुमान सीतेला शोधत शोधत आला होता तेव्हा तो महाकाय रूप घेऊन आला होता असे मानले जाते आणि स्थानिक लोकांची अशी धारणा आहे कि तेथील जंगलामध्ये दिसून येणाऱ्या पाऊलखुणा ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून खुद्द हनुमानाच्या आहेत.


तरंगणारे दगड

राम सेतू बांधण्यासाठी तरंगणाऱ्या दगडांचा वापर करण्यात आला होता अशी माहिती उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी केरळमध्ये आलेल्या सुनामीदरम्यान असे काही दगड वाहत वाहत किनाऱ्यावर आलेले आढळून आले.


संजीवनी पर्वत

रामायण युद्धादरम्यान लक्ष्मणाला वाचविण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला असे म्हटले जाते. द्रोणागिरी पर्वत जेथून उचलण्यात आला होता तेथे अजून पण कापलेला भाग दिसून येतो.


श्रीलंकेत आढळणारी काही विदेशी झाडे

श्रीलंकेच्या काही भागात झाडांच्या अशा काही जाती आढळून येतात ज्या फक्त हिमालयात उपलब्ध आहेत. हनुमानाने पर्वत उचलून नेल्यामुळे त्या झाडांच्या जाती तेथे पसरल्या असण्याची दाट शक्यता आहे.

अशोक वाटिका

हनुमानाने अशोक वाटिकेचा बराचसा भाग जाळून उद्धवस्त केला असला तरी काही भाग वाचला. सध्याचे हकगला बोटॅनिकल गार्डन म्हणजेच प्राचीन अशोक वाटिका असावी असे मानले जाते. स्थानिक लोक त्याला सीथा एलिया असे संबोधितात.


रामायणात वर्णन केलेले चार सुळ्यांचे हत्ती

हनुमान जेव्हा लंकेमध्ये पोचला तेव्हा त्याला तिथे ४ सुळ्यांचे हत्ती पहारा देत असल्याचे आढळले असे वर्णन सुंदरकांडामध्ये करण्यात आले आहे. अशा ४ सुळ्यांच्या हत्तीची जीवाश्मे अनेक ठिकाणे आढळून आली आहेत.


रामायणासंबंधित असे कित्येक पुरावे देता येतील. पण उत्तर खूप लांबत जाईल म्हणून तूर्तास इतकेच लिहतो.

सर्व फोटो गुगलवरून घेण्यात आले आहेत.

धन्यवाद.

✍️संकलन : सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

"शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

संत अमाई माता